Saturday, April 14, 2012

टिपेश्वर पुनर्वसनाचा प्रस्ताव आदिवासींना अमान्य-१८ रोजी टिपेश्वर येथे आदिवासी पंचायत

टिपेश्वर पुनर्वसनाचा प्रस्ताव आदिवासींना अमान्य-१८ रोजी टिपेश्वर येथे आदिवासी पंचायत
तभा वृत्तसेवा-यवतमाळ, १४ एप्रिल
टिपेश्वर गावाच्या पुनर्वसनासाठी संपूर्ण रक्कम जिल्हाधिकारयांकडे पोहोचली आहे. मात्र येथे मागील अनेक पिढ्यांपासून शेती करून राहात असलेले कोलाम व आदिवासींना हा पुनर्वसनाचा प्रस्ताव अमान्य आहे. विदर्भातील एक महत्त्वाचे, पट्टेदार वाघांचा धुमाकूळ व मृत्यूसाठी चर्चेत असलेल्या टिपेश्वर अभयारण्यातील टिपेश्वर, पिटापुंगरी व मारेगाव या गावांचे पुनर्वसन अभयारण्याबाहेर व्हावे ही मागील दशकापासून प्रलंबित मागणी वनखात्याचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांच्या पाठपुराव्याने पूर्ण होत असून याचा पहिला टप्पा म्हणून टिपेश्वर गावाच्या पुनर्वसनासाठी संपूर्ण रक्कम जिल्हाधिकारयांकडे पोहोचली आहे.
मात्र टिपेश्वर येथे मागील अनेक पिढ्यांपासून शेती करून राहत असलेले कोलाम व आदिवासींना हा पुनर्वसनाचा प्रस्ताव अमान्य आहे. या पुनर्वसनाबाबत आदिवासींना भूमिहीन होऊन जीवन बदल्यात जमीन व अभयारण्यातील विस्थापित होणारया आदिवासींच्या मुलांना वनखात्यात नोकरी असे अनेक प्रस्ताव सरकारसमोर ठेवले असून याची प्रस्ताव रूपाने मांडणी करून सरकार समक्ष ठेवण्यासाठी येत्या १८ एप्रिलला टिपेश्वर येथील नेते व विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी, माजी जिल्हा परिषद सदस्य व कोलाम नेते तुकाराम मेश्राम, पांढरकवडा येथील नगरसेवक अंकित नैताम यांना पाचारण करण्यात आले आहे.या कार्यक्रमात पिटापुंगरी, दर्यापूरसह टिपेश्वरमधील शेतमजूर वशेतकरी आपल्या अडचणी मांडतील, अशी माहिती टिपेश्वर आदिवासी वाचवा समितीचे लक्ष्मण येडमे, कवडु टेकाम, सुधाकर येडमे, भीमराव टेकाम, परसराम आत्राम यांनी दिली.
ग्रामसभेमध्ये आदिवासींनी टिपेश्वर येथील आपली वस्ती सोडण्यास संमती दिली होती. मात्र त्यांनी याच प्रस्तावामध्ये जमिनीच्या बदल्यात जमीन, गावाच्या बदल्यात पूर्ण वस्तीचे निर्माण व विस्थापित होणारया आदिवासी कुटुंबांतील युवकांना वनरक्षक किवा वनकामगार म्हणून नोकरी द्यावी, अशा मागण्या रेटल्या होत्या. मात्र सरकारने या मागण्या अमान्य करून जबरीने आदिवासींचे गट पाडून राजीनामे घेण्याचे सत्र सुरू केले असून यामुळे आदिवासींमध्ये असंतोष वाढला आहे. सर्वमान्य तोडगा निघावा यासाठी १८ एप्रिलला आदिवासी नेते किशोर तिवारी यांच्या मध्यस्तीने सरकार दरबारी प्रस्ताव नेण्यासाठी एकत्र येत असल्याची माहिती चंद्रभान कुळसंगे, कर्णु, शेडमाके, हनमंतु शेडमाके, वंसत मडावी, भुतु मेश्राम, गजानन आत्राम, बळीराम कोवे, तुकाराम आत्राम यांनी दिली.
=======================
=======================

No comments: